शनिवार, २० डिसेंबर, २००८

मुलगी


ती जन्मली की कपाळावर

अजूनही का पडतात आठ्या ?

टोमणे खात खात हळव्या पोरी

होत जातात मोठ्या


त्याला सगळं मिळतं आधी

तिला नेहमीच नंतर

एकाच रक्ताची ती दोघं

तरी का हे पडतं अंतर ?


दुर्लक्षित ती जगता जगता

झेप घेते आकाशात

काळोखाची छेदून भिंत

वाट शोधते प्रकाशात


तिळ तिळ तुटतो तिचा

थकल्या आई बाबांसाठी

म्हणते मीच होईन बाबा

तुमच्या म्हातारपणची काठी


लेकीच्याच मनात

दाटे मायेचा ओलावा

तिच्या कपाळीचा गंध

देवा आयुष्यभर फुलावा

रविवार, १४ डिसेंबर, २००८

गाडी बुला रही है



गाडी बुला रही है












भारतीय रेल्वे हा जगातील एक चमत्कार आहे.भारतात जर रेल्वे नसती तर कितीतरी लोकांसमोर समस्या उभ्या राहिल्या असत्या याची कल्पना करवत नाही.जर ही रेल्वे नसती तर रेल्वे स्टेशनशेजारी असणार्‍या गावातील शेगड्या कशाने पेटल्या असत्या ? भिकार्‍यांनी पेटी वाजवत केशवा माधवाची गाणी कुठे म्हटली असती ? खिशात पैसे नसताना दूरच्या नातेवाईकांच्या भेटी कशा घडल्या असत्या ? रेल्वे तशी उदार आहे. येणं फुकट जाणं फुकट पकडले गेलो तर जेवणही फुकट ! असा तिचा उदार कायदा आहे. प्रवासी व मालवाहतूक ही रेल्वेची मुख्य कामगिरी .
या व्यतिरिक्त हिन्दी सिनेमात रेल्वेने खलनायक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे याचा अभिमानाने उल्लेख करावा लागेल.एखाद्या दुर्घटनेत कुटुंब उध्वस्त झाल्यानंतर अनेक भावांना चरितार्थासाठी मुंबईत आणून सोडण्याचं कार्य मध्यंतरी रेल्वेने निष्ठेने सुरू ठेवलं होतं. मात्र लहान भावांना त्या काळी खूप तहान लागायची. मोठ्या भावाला पाणी आणायला जावं लागायचं.त्या काळी संपूर्ण स्टेशनवर एकच नळ असायचा.शिवाय तेंव्हा मिनरल वॉटरचा जन्म झालेला नसल्यामुळे गाडी सुरू व्हायच्या आत पाणी घेऊन डब्यापर्यंत पोहोचणे मोठ्या भावांना शक्य होत नसल्याने दोन भावांची ताटातूट करण्याचे घोर पातक रेल्वेने केल्याने अनेक कुटुंबातील मोठे भाऊ त्या काळी रेल्वेचा प्रवास टाळत असत.मोठ्या भावांच्या संघटनेनं त्याकाळी या अन्यायाविरोधात आंदोलन केलं होतं हे जुन्या लोकांच्या स्मरणात असेलच आज मुंबईत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या श्रीमंतांना नशीब अजमावण्याची संधी त्याकाळच्या टी सी च्या मेहेरबानीमुळे मिळाली आहे.

रेल्वेस्टेशनवरील टाईमटेबल समजणारा मनुष्य तर सर्व जगाला परमेश्वरानंतर वंदनीय आहे. अप म्हणजे येणारी की जाणारी हे ज्याला समजले त्याला आपला नेता मानावे व त्याच्या मागे इतरांनी बिनधास्त पळावे.प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक चौकशी काऊंटर असते.गाडी किती लेट आहे या प्रवाशांच्या एकमेव प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तिथे एका व्यक्तीची नेमणूक केली जाते. निर्वीकारपणे प्रश्नकर्त्याकडे लक्ष न देणारी ती व्यक्ती बघितली की वाटतं या पदावर बहिर्‍या व्यक्तीची नेमणूक करायला हवी.
रेल्वे म्हणजे परोपकारी माणसांचा महासागरच म्हणायला हवी.गाडीत चढतांना किंवा उतरतांना आपल्याला स्वत:ला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपण एकदा त्या गर्दीचा भाग झालो की मागच्या माणसांची जबाबदारी सुरू होते.वर्षानुवर्षे ही माणसे इमाने इतबारे ही कामगिरी पार पाडत असल्याने आपण आपोआप आत शिरू शकतो किंवा बाहेर पडू शकतो.या सामजिक कामासठी ते कुठलाही मोबदला मागत नाहीत.सेवाभावी वृत्तीचे असे मनोहारी दर्शन केवळ रेल्वे प्रवासातच अनुभवायला मिळते.दुसर्‍यांसाठी अगोदरच्या स्टेशनपासून जागा पकडणार्‍या परोपकारी माणसांचे दर्शनही रेल्वेत बघायला मिळते.

रेल्वे ही फक्त प्रवाशांची नसून इडली , वेफर्स विकणार्‍या पॅन्ट्रीकारच्या सेवकांपासून पाववडे,शेंगादाणे ,चिक्की,वेफर्स, केळी, वर्तमानपत्रे फेरीवाल्यांचीही आहे.याबरोबरच भिकारी हा सुद्धा रेल्वेचा अविभाज्य घटक आहे.भिकार्‍यांना टाळून प्रवाशांना रेल्वेतून पळून जाता येत नसल्याने भिकार्‍यांच्या मनात रेल्वेने आदराचे स्थान मिळवले आहे.'केशवा माधवा' या गाण्यावर भिकार्‍यांशिवाय इतर कुणाचाही अधिकार सध्यातरी उरलेला नाही. हे गाणे सूरात गाणार्‍यांना भरपूर कमाई होते.'केशिवा माधिवा 'असा उच्चार कानी पडला की समजावं हे दाक्षिणात्य भिकारी आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करतांना या गाण्यापुरती तरी मराठी भाषा त्यांनी शिकून घेतली आहे. त्यामुळे मराठी भिकार्‍यांना जोरदार स्पर्धा तयार झाल्याने याही क्षेत्रातून मराठी माणसाची पिछेहाट होते की काय अशी भीती तयार झाली आहे ! केळी व शेंगा विकणारा येऊन गेल्यानंतर त्यापाठोपाठ केरसुणी घेऊन डबा झाडायला मुका मुलगा हमखास येणारच ! प्रवासी गाडीतच कचरा टाकणार हा आत्मविश्वास त्याच्या पोटाची सोय करून जातो.मुका मुलगा पुढच्या स्टेशनवर गाडीतून उतरल्यावर शेंगावाल्याशी जोराने भांडतांना पाहिल्यावर प्रवासी मुके होतात.

बाकी रेल्वे प्रवासाची सर इतर प्रवासाला येत नाही.सुपरफास्ट गाड्यांपेक्षा पॅसेंजरमधील प्रवासी एकमेकांची लगेच ओळख करून घेतात.जेवणाचा डबा उघडल्यानंतर समोरच्याला आग्रह करणारी माणसे पॅसेंजरमधेच भेटतात.रेल्वे संस्कृतीची ओळख करून देते. केरळचे बॅकवॉटर, सिंधुदुर्गचा स्वच्छ समुद्रकिनारा,निसर्गरम्य कोकण,माथेरानचा गार वारा,खंडाळ्याच्या डोंगरातून कोसळणारे जलप्रपात,सह्याद्रीच्या डोंगरदर्‍या यांचे विलोभनीय दर्शन रेल्वेमुळेच होऊ शकते.भूगोलाच्या पुस्तकांमध्ये ज्या नद्या केवळ रेषा बनून राहतात त्या प्रवाही होऊन वाहतांना सुंदर दिसू लागतात. नद्यांनी दोन्ही तीरांवर उभी केलेली संस्कृती अनेकांचे जीवन समृद्ध करतांना बघून नदी हा केवळ पाण्याचा प्रवाह नसतो याची जाणीव होते.वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद देत, खवैय्यांच्या जिव्हेला तृप्त करत रेल्वे मार्गक्रमण करत राहते.अपवाद फक्त चहाचा !भारतात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर मिळणार्‍या चहाची चव सारखीच असते. स्टेशनवरचा चहा प्याल्यानंतर भारतात पाणीटंचाई असते यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

नाशिकची द्राक्षे , जळगांवची केळी, लखनऊचे पेरू, रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्री,नांदेडची सिताफळे, काश्मीरची सफरचंदे झाडांवर लगडलेली पाहतांना मन प्रसन्न होते.मराठी गड्याचा कोल्हापुरी फेटा, राजस्थानची पगडी, तमिळी अन्नांची लुंगी,बंगाली बाबू मोशायचे एकटांगी धोतर ही विविधता काही तासांच्या प्रवासाताच अनुभवायला मिळते.म्हणूनच रोजच्या जगण्यात जेंव्हा साचलेपणा निर्माण होतो, मनाला नावीन्याची ओढ लागते तेंव्हा रेल्वेची शिटी साद घालते आणि प्रवासासाठी पावले आपोआप रेल्वेकडे वळू लागतात.

वडील





वडील




आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,आयुष्यातील श्रद्धास्थान .आईवर खूप कविता आहेत.

मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.

माझा एक प्रयत्न..............




वडील


त्यांच्या खांद्यावर बसून


जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच


आयुष्यभर घरासाठी वडील


होऊन राहतात कवच



सावरण्यासाठीच असतात


त्यांचे मजबूत हात


असतात वडील तोवर


जाणवत नाहीत आघात



ऊन वारा पाऊस झेलत


वडील लकाकी हरवून जातात


उडून जातात पाखरं तेव्हा


वडील एकाकी होऊन जातात



दाटून येतो कंठ गळ्यात


पण अश्रू पापणीतून गळत नाही


आपण वडील झाल्याशिवाय


मोठेपण त्यांचं कळत नाही








शनिवार, १३ डिसेंबर, २००८

एकमेकात गुंतलो की आयुष्य सुरेल गाणे होते



एकमेकात गुंतलो की आयुष्य सुरेल गाणे होते



दरवर्षी व्हॅलेन्टाईन येतो

दर वर्षी तो तयारी करतो

तिच्यासाठी फुले घेऊन

दर वर्षी तो उभा राहतो


व्हॅलेन्टाईनसाठी त्याला

फुलं हवी असतात

ताजी आणि नवी नवी

कारण दरवर्षी

तीही असते नवी नवी


तिच्यासाठीही तो असतो नवा नवा

तरीही तिला तो वाटतो हवा हवा

फुलपाखरासारखं त्याचं मन

असं उंडारत राहतं

नवी फुलं नव्या बागा शोधत राहतं

अजून काही त्याचा शोध संपला नाही

कुणामध्येही त्याचा जीव गुंतला नाही


एक दिवस आजोबा म्हणाले त्याला

अरे आज व्हॅलेंटाईन

जायचं नाही का तुला ?

म्हणाला आजोबांना तो,

आजोबा , रागावणार नसाल

तर एक विचारू तुम्हाला ?

आजोबा होते खुषीत

हसले आपल्या मिशीत

म्हणाले नातवाला,

अरे आज व्हॅलेंटाईन ना ?

मोकळीक आहे तुला

नातूने विचारलं धाडस करून

आजोबा तुम्ही लग्नाआधी

आजींना मेसेज पाठवला होता का कधी ?


झुबकेदार मिशातून आजोबा मोठ्याने हसले

म्हणाले नातवाला

अरे तेव्हा कशाचा आला रे मोबाईल ?

आणी मग आजीला मेसेज कसा रे जाईल ?

अरे बंधनांचा होता तो जमाना

डोळ्यांच्याच नुसत्या खाणाखुणा

नजरेला भिडता नजर

दोघांचही ह्रदय धडकायचं खास

समजायचं संदेश आपल्या प्रेमाचा

तिच्या ह्रदयात झाला पास

गाण्यांच्या भेंड्यात गायचो

तिच्या सौंदर्याचीच गाणी

चोरून बघायची माझ्याकडे

तेव्हां लेका , काळजाचं व्हायचं पाणी


जन्मजात गबाळा मी

रोज करू लागलो दाढी

आवडत नव्हती तिला म्हणुन

सोडून दिली विडी


नातू सुन्न होऊन ऐकत होता

आजी आजोबांच्या प्रेमाची कथा

आजोबा म्हणाले त्याला ,

अरे प्रेम म्हणजे

काटा टोचता एकाच्या पायात

कळ येते दुसर्‍याच्या ह्रदयात

असा जीव गुंतावा लागतो

एकमेकांच्या ह्रदयात

आपुलकीचा सडा कायम शिंपावा लागतो

मग वादळवार्‍यातही प्रेम फुलू लागतं

जगण्याला बळ मिळू लागतं

अशा प्रेमाला नातू महाराज ग्रिटींग्जची गरज नसते

प्रेम असं पोरा शेवटपर्यंत निभावता आलं पाहिजे

मग येणारा प्रत्येक दिवस

प्रेमाचा तराणा होऊन जातो

मग तुला पोरा व्हॅलेटाईनसाठी बहाणा का लागतो ?


नातवाच्या डोळ्यात तेव्हा

आभाळ होते दाटले

आजोबांचे शब्द त्याच्या कानात होते साठले

म्हणाला आजोबांना तो

कुणासाठी तरी निष्ठेने आयुष्य मी वाहीन


मग प्रत्येक दिवस माझा होईल व्हॅलेंटाईन

नेता व्हायचंय एका रात्रीत ?


पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या
समाजसेवेनंतर
नेते तयार होत असत.

आता जमाना बदललाय.

जीवन गतिमान झालंय.

डिजिटल युग आलंय.

आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत.

तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे.

तुम्ही फक्त एवढंच करायचं ५०० रुपये खर्चाची तयारी ठेवायची.

अजून मिशाही न फुटलेला परंतु ५०० रुपये खिशात असणारा कोणीही या देशात डिजिटल बॅनर लावून नेता होऊ शकतो.
नेता व्हायची पहिली पायरी : आपल्या दोन मित्रांचे फोटो गोळा करा.तुमचा एक हात उंचावलेला फोटो काढून घ्या आणी स्वत:च्या वाढदिवसाला स्वत:च शुभेच्छा देण्याच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हा.
नेता व्हायच्या या शॉर्टकटवर लिहिलेली माझी एक कवीता


नेता व्हायचंय एका रात्रीत ?

दाखवून टाक झलक

चौकाचौकात लाव पोरा

शुभेच्छांचे फलक

घरादारात गल्लीबोळात

जरी नसेल तुला स्थान (कुत्रंही विचारत नाही)

फलकावरती लिहून टाक

युवकांचे आशास्थान


वडील नेहमीच ओरडत असतात

दाखव काही तरी कर्तृत्व

हरकत काय रे लिहायला

शहराचं खंबीर नेतृत्व ?

वाढेल वलय नेतृत्वाचे

मिळेल तिथे खाता खाता

होऊन जाशील बेट्या एक दिवस

तूच आमचा भाग्यविधाता