शनिवार, ९ मे, २००९

सज्जनांचे पसायदान

सज्जनपणा हाच जीवनातील अडथळा ठरल्याची खंत सज्जनांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात हुकलेले रंगीन क्षण टिपण्याचा हा प्रयत्न

सज्जन माणसे मनाने फारच सोज्वळ असतात

बायकोशेजारी देखील अंतर ठेवून बसतात

बायकोशिवाय त्यांच्या स्वप्नात दुसरी कुणी येत नाही

खरा सज्जन डोळ्यांचा गैरवापर कधी करत नाही

मित्रहो एका रात्रीत कुणी खरा सज्जन होत नाही

झाला चुकून कोणी तर विश्वास लवकर बसत नाही

सज्जनपणा तसा बालपणापासूनच अंगी असावा लागतो

मोह टाळून आयुष्यात नुसताच त्रास सोसावा लागतो

रांग आयुष्यात त्यांनी चुकूनही मोडली नाही

कामे मागच्या दाराची त्यांना कधी जमलीच नाही

कॉलेजमध्ये मैत्रीणींशी त्यांनी कधी केला नाही दंगा

नाही केली भानगड कुणाशी नाही घेतला पंगा

कॉलेजमध्ये राहूनही नाही ठरले ते नशीबवान

संधी न मिळाल्याने गेले राहून चारित्र्यवान

जिवापाड जपले ब्रम्हचर्य मेनकांना नाही दिली संधी

खेटल्या ज्या अंगाशी केली त्यांना हृदयात बंदी

खरा सज्जन जपत असतो कायम देवाचेच नाम

लग्नाआधी जपतो 'जयहनुमान' , लग्नानंतर 'जय श्रीराम'

सज्जन माणसं बायकोशी तशी एकनिष्ठ असतात

बायको माहेरी जाताच इकडे तिकडे बघतात

'फॅशन' चॅनेल कधी कधी सज्जन अगदी जवळून बघतात

लागताच बायकोची चाहूल पटकन 'संस्कार' लावतात

तेवढं सोडलं तर आयुष्यात त्यांच्या पराक्रम दुसरा नसतो

करायला जातात धाडस तेंव्हा प्रयत्न नक्कीच फसतो

सज्जन्नांनी पृथ्वीवरती देवा नुसताच त्रास सोसला

प्रत्येक क्षण आयुष्याचा त्यांचा संयमाने नासला

स्वर्गामध्ये इंद्रदेवा द्या त्यांना भरपूर सवलती

पृथ्वीवरचे तेंव्हा नसावे मुळीच कुणी अवतीभवती

कसर पृथ्वीवरची मनसोक्त सज्जनांना काढू द्या

सोसण्याची त्यांच्या आता तरी कदर होऊ द्या

झिंग जगण्याची त्यांना तिथे तरी चढू दे

होऊनी जरा जास्तच मयसभेत आडवे पडू दे

स्वर्गामध्ये इंद्रदेवा त्यांना असू दे तुझ्याच सवेत

रंभेला चेपू दे पाय अन अप्सरा असू दे कवेत

पृथ्वीवर वाढतील सज्जन जर स्वर्गात कराल कदर

पसायदान देवा माझे सज्जनांसाठी करतो सादर

गुरुवार, ७ मे, २००९

अबोला



मोबाईलचा प्लॅन रिलायन्सचा

मोबाईल टू मोबाईल फ्री बोला

अरे मग अनिल आणि मुकेशमध्ये 

का बरं अबोला ?

पहिला घोट पहिलीच आठवण


सौमित्रच्या 'पहिला पाऊस पहिलाच गंध ' या गारवातील कवितेचं हे विडंबन


पहिला घोट पहिलीच आठवण

पहिल्या बाटलीचं पहिलंच झाकण

पहिला बार पहिला गंध

पहिल्या मनात पहिलाच सुगंध

पहिला सोडा पहिलेच दाणे

पहिल्या झिंगेनंतर पहिलेच गाणे

पहिलं कॉकटेल पहिलीच रम

पहिल्या धारेचा पहिलाच थेंब

पहिली भानगड पहिलंच फ्रॅक्चर

पहिल्या पानावर पहिलंच पिक्चर

पहिला घोट पहिलीच आठवण

पहिल्या बाटलीचं पहिलंच झाकण

बुधवार, ६ मे, २००९

हेल्मेट


मध्यंतरी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती त्यावेळी लिहिलेली ही कविता




'हेल्मेट 'वर कवीवर्य मंगेश पाडगांवकर आणि सौमित्र यांनी जर कविता लिहिली असती तर कदाचित ती अशीच लिहिली असती .


विडंबनाचा एक प्रयत्न

'हेल्मेट' पाडगांवकरांच्या शैलीत


हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं


मराठीतून त्याला कवच म्हणता येतं

हिंदीतून त्याला शिरस्त्राण म्हणता येतं

हेल्मेट हेच त्याचं दुसरं नेम असतं

हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं


हेल्मेटच्या सक्तीचा सरकारी कायदा आहे

खरं तर हेल्मेटचा आपल्यालाच फायदा आहे

एकदा डोक्यात घातलं की

हेल्मेट झपाट्याने काम करू लागतं

नको असण्यार्‍यांच्या समोरून कसं

बिनधास्त जाता येतं

घेणेकर्‍यांचा तर त्रासच मिटला

त्यांना उत्तम टाळता येतं

अगदीच मस्त सोय महाराज

सुंदरींकडे टक लावून पाहता येतं

दारू पिऊन पडलात तरी

डोकं फुटणार नसतं

कारण

हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं

हेल्मेट सौमित्रच्या 'गारवा' शैलीत


तो- दुचाकीस्वार

ती -ट्रॅफिक सिग्नलवर दबा धरून बसलेली शिट्टी

सक्ती जरा जास्तच आहे

दर वर्षीच वाटतं

हेल्मेटचं नांव काढताच

ओझं मनात दाटतं

तरीही चाकं चालत राहतात

मन चालत नाही

हेल्मेटशिवाय रस्त्यांवरती

कुणीच बोलत नाही

कुठून तरी अचानक एक दादा समोर येतो

शिट्टीचा काही भाग ओठांखाली घेतो

दुचाकीस्वार जीव तोडून सैरावैरा धावत राहतो

गल्लीबोळात, चौकाचौकात लपू पाहतो

चक्क सर्वांसमोर दादा माल खिशात टाकतो

पगाराआधीच कुठून हा बोनस त्याच्या हाती येतो ?

दुपार टळून संध्याकाळपर्यंत सुरू असतो हाच खेळ

दादा निघून जाताच चालून येते सुरक्षित वेळ


त्याला हेल्मेट आवडत नाही

तिला हेल्मेट आवडतं

हेल्मेटचं नांव काढताच

डोकं त्याचं भडकतं

दुसर्‍यांना टोप्या घालण्यापेक्षा

हेल्मेट का घालत नाहीस

तिचे असले प्रश्न

त्याला खरंच कळत नाहीत

हेल्मेट म्हणजे गुंतलेले हात

हेल्मेट म्हणजे सांभाळण्याचा त्रास

हेल्मेट म्हणजे वजन अर्धा किलो

हेल्मेट म्हणजे सक्ती उगाच


दरवेळी फिरायला गेल्यावर

दोघांचं हे असं होतं

दंडावरून भांडण होऊन

जगामध्ये हसं होतं

हेल्मेट आवडत नसलं तरी

बाईक त्याला आवडते

हेल्मेटसकट आवडावं म्हणून

तीही झगडते

चिडून मग ती दंड करते

उभं करते पुतळ्यासारखं

त्याचं तिचं भांडण असं

होत राहतं सारखं सारखं

शनिवार, २ मे, २००९

कवी संमेलन - गल्ली ते दिल्ली



साहित्य संमेलनात ज्यांना कविता सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कवींनी आयोजीत केलेल्या साहित्य 

संमेलनास उपस्थीत राहण्याचा योग आला. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय, नोकरी करणार्‍या कवींनी आपल्या 

कवीता या मैफलीत सादर करून एकच धमाल उडवून दिली.

सर्वप्रथम भाजीपाल्याचे ठोक व्यापारी गणपतराव यांनी आपली 'परसबाग' ही रचना सादर केली.



हिरव्या मिरचीचा तोरा

चाफेकळीच्या नाकावर

कसा शोभतो अबोला

टमाट्यांच्या गालावर


भुरूभुरू उडती बटा

डुले जसा तुरा मक्याचा

पाठीवर रुळे शेपटा

जसा वेल पडवळीचा


जसा हिरव्या कोशिंबीरीवर

रंग बीटाचा सांडला

सखे जीव माझा

तसा तुझ्यावर जडला

केवळ तीन कडव्यात गणपतरावांनी सर्व रसिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीची सफर घडवून आणली. प्रेम आणि भाजी मार्केट ही दोन्ही चित्रे कवितेत एकाचवेळी मांडण्याचा काव्यविश्वातील हा पहिलाच प्रयत्न होता.कवितेतील शब्द किती ताजे आणि रसरशीत होते हे सांगायला नकोच !

त्यानंतर ट्रक ड्रायव्हर बाबू याने ( ट्रक खाली होईपर्यंत)'जीवन एक गाडी' ही कविता सादर केली .





जीवनाच्या गाडीची असते का कधी सोपी वाट ?

पार करावे लागतात वळणावळणाचे घाट

खडबडीत रस्यांवर कधी आयुष्याचं चाक पंक्चर होतं

ओझं असह्य होऊन कधी चाकही फुटतं

नवी जोडी टाकून नवी उमेद घेऊन पुढे चालावं लागतं

गाठण्यासाठी ध्येय रात्रंदिवस चालत राहावं लागतं
वाटेत संकटे उभी राहतात नाक्यानाक्यावर लाल दिवा होऊन

डगमगू नका त्यांचा रुद्रावतार पाहून

'एन्ट्री ' तुमची होताच संकटं निघून जातात

मात्र एक लक्षात असू द्या

आडवाटेने जातांना रस्ताही चुकतो

मोठ्यांशी संघर्षात आपण प्राणासही मुकतो

म्हणून थांबा पहा चला

हाच जीवनाचा मूलमंत्र आहे

डाव्या बाजूने पुढे पुढे मार्गक्रमण करीत रहा

मागच्यांना पुढे जाऊ देऊ नका

पुढे आहेत त्यांच्याही पुढे निघा

अंतीम विजय तुमचाच

बाबूभाईंनी कवितेत स्पेशल गिअर टाकला होता.ममद्या क्लिनर,गालीब फिटर,अण्णा टायरवाला,मारूती वेल्डर यांनी जोरदार टाळ्या वाजवून बाबूभाईंच्या कवितेला दाद दिली.कविता आशयाच्या बाबतीत किती 'गतिमान' असते आणि अभिव्यक्तीची कुठली 'वळणे' घेऊ शकते हे बाबूभाईंनी दाखविल्याने रसिक भारावून गेले होते.

गालीब फिटरलाही त्यामुळे स्फूर्ती आली आणि त्यानेही एक कविता सादर केली


पहिल्या भेटीतच झालीस तू

माझ्या जीवनाची अक्सेंट

सफारीसारखी देशील का

जागा हृदयात प्रशस्त


रुप तुझे देखणे आयकॉन परी

लान्सरच्या वेगाने

येशिल का हृदयाच्या मंदिरी ?

नॅनोसारखे तुझ्यासाठी

सखे लागती नंबर

ओळख प्रेम खरे माझे

जरी तुझ्यामागे प्रेमवेडे शंभर


नको करूस चिंता

गावातल्या रस्त्यांची

तुझी पुरवीन हौस

द्रुतगती महामार्गाची


वाट पाहिन तुझी

गडी आहे मी धीराचा

कधी ओलांडशील उंबरा

सखे माझ्या घराचा


तेवढ्यात बाबूभाईने गालीबला मध्येच टोकले



नव्या नव्या मॉडेल्सचा तुला षौक भारी

कसे यावे लान्सरने कायमचे तुझ्या घरी ?


बाबूभाईंनी कवितेतले वास्तव ठळकपणे रसिकांसमोर मांडल्याने गालीबची पंचाईत झाली .रसिकांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट करून बाबूभाईंच्या मताशी सहमती दाखवली

आमदार दादासाहेब यांच्या ( लग्नाच्या) पत्नी गुणवंताबाईंनी उपश्तित राहून कविता सादर केली.


जेंव्हा बघावं तेंव्हा

चिकटून बसता खुर्चीला

वाटू लागले मनाला

विसरलात काय बायकोला ?


सदानकदा काढतात दौरे

आतल्या रूममध्ये मिटींगा

चौफुल्यावर मुक्काम करता

बघा आता माझा इंगा


घरच्या मतदारसंघाचा

आधी विकास करा

तालुक्याच्या प्रत्येक गावी

नंतर पाहिजे तेवढं फिरा


गुणवंताबाईंच्या स्पष्टोक्तीमुळे आमदार दादासाहेबांना आपल्या घरच्या मतदारसंघात किती समस्या साचल्या आहेत याचा साक्षात्कार झाला. कवितेमुळे आत्मभान जागे होणे हेच कवितेचं खरं सामर्थ्य असल्याचा प्रत्यय आला.


शेवटी मोहन स्वीट मार्टचे मालक मोहनभाई कराचीवाला यांनी आपली कवितेची जुनी चोपडी उघडली.


सखे तुझे डोळे

जसे जिलेबीचे वेटोळे

तू काजू कतली नाजूक

जसे रवाळ तूप साजूक


जिन्स घालून मागतेस पोरी

बर्गर आणि पिझ्झा

वडापावाची का सखे

येईल त्याला मजा


असे जरी बावळा

तेलकट वेष माझा

शहरातल्या हलवायांचा

मीच आहे राजा


होशील का गडे खरेच

राणी तू माझी

आयुष्यभर स्वयंपाकाची

मिटेल काळजी तुझी


कवितेचा शेवट सखीसाठी आश्वासक होता .सखीवर कवितेचा परिणाम होण्याऐवजी रसिकांची भूक जागी झाल्याने मोहनभाईंच्या दुकानावर रसिकांनी आपला मोर्चा वळवल्याने काव्य मैफल समाप्त झाली .





शुक्रवार, १ मे, २००९

चॅनेल्सची भटकंती


संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीवर बातम्या बघण्यासाठी दिन्या सोफ़्यावर बसतो. ' सबसे तेज ' हे त्याचं आवडतं चॅनेल.त्याला स्थानिक बातम्यांमध्ये फारसा रस नाही.दिन्या किमान राज्यपातळी किंवा त्यापुढील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळतो.तालीबानच्या बंदोबस्तासाठी बराकने कुठली खेळी खेळायला हवी होती हे फक्त दिन्याच सांगू शकतो.गॉर्डनचं कुठे चुकलं हे फक्त दिन्यालाच कळतं.बराक आणि गॉर्डन दिन्याच्या टीकेला जाम टरकून असतात. बराक म्हणजे आपला ओबामांचा दिवटा ! आणि गॉर्डन म्हणजे यु के च्या ब्राऊनचं शेंडेफळ !परवाच बराक विजयी झाला तर जगभरातून त्याचं अभिनंदन होत असतांना बराकने अगोदर दिन्याला फोन केला .म्हणाला दिनकरराव , खरं तर बराक ड्रिंकरराव असंच म्हणाला होता ते जाऊ द्या. बराक म्हणाला होता , दिनकरराव तुम्ही ' यस वुई कॅन ' ही स्लोगन दिली नसतीत तर माझं काही खरं नव्हतं. शरदरावांनी विलासरावांना कसा शह द्यायला हवा होता याची खबरबात आबांशिवाय फक्त दिन्यालाच आहे.अटलांटीक समुद्रापारचे साहेब आणि आपले बारामतीचे साहेबही आपलं ऐकत असतांना घरात बायको आपलं ऐकत नाही हे शल्य त्याला आहे .
आज जेंव्हा तो ऑफीसहून घरी परतला तेंव्हा आपण ऑफीसला गेल्यापासून जगात काय काय उलथापालथ झाली असेल या चिंतेने तो व्याकूळ झाला होता. मात्र चिरंजीवांनी अगोदरच टेन स्पोर्टसचा ताबा घेतलेला असल्याने अजून अर्धा तास तरी आपल्याला संधी मिळणार नाही हे जाणून तो वर्तमानपत्र वाचू लागतो.सकाळीच सगळ्या बातम्या ' येथे छापून येथे प्रसिद्ध केले ' इथपर्यंत वाचून झालेल्या असल्याने तो शब्दकोडे सोडवू लागतो.बायकोने अगोदरच बरंचसं चुकीचं सोडवून ठेवलेलं असल्याने त्याच्या दुरूस्तीत दिन्याचा बराचसा वेळ जातो.मधूनच तो टीव्ही कडे नजर टाकतो. चिरंजीव डबल्यू डबल्यू ई वर रक्तपात बघण्यात दंग झालेले असतात.खली आणि अंडरटेकरची मारामारी सुरू असते.खलीला ठोशांवर ठोशे बसत असतांना चिरंजीव चिंताक्रांत होतात. रेफ्री अंक मोजू लागतो. नवव्या अंकापर्यंत येतो तेंव्हा तिकडे खली उठून उभा राहतो आणि इकडे चिरंजीव ! एकदाचा खली लवकर जिंकावा अशी दिन्या प्रार्थना करतो.प्रादेशिक बातम्यांची वेळ झाल्यावर दिन्या चिरंजीवांना अभ्यासाची आठवण करून देतो. अभ्यास करूनच चिरंजीव टी व्ही बघायला बसल्याचा संदेश किचनमधून आल्याने दिन्याचा नाईलाज होतो. अंबानी बंधूंची मारामारी रंगलेली असतांना खली आणि अंडरटेकरची मारामारी बघणे त्याला असह्य होते.तेवढ्यात जाहिराती सुरू होतात.दिन्या संधी साधून रिमोट हातात घेऊन बातम्या लावतो. चिरंजीवांना पुढील धोका लगेच लक्षात येतो.तो म्हणतो पपा , 'पप्पू पास हो गया' ही जाहिरात राहू द्या ना . ही जाहिरात ऐकताच बायको किचनमधून धावत येते.किती छान आहे ना असं लाडिकपणे दिन्याला म्हणते. बहुमत आपल्या बाजूला नसल्याचं दिन्याच्या लक्षात येतं. तो पुन्हा टेन स्पोर्टस लावतो.एकदाचा खली जिंकतो.खलीने आतापर्यंत शॉन मायकेल ,जॉन सेना, रॅन्डी ऑर्टन ,ट्रिपल एच यांना कसं हरवलेलं आहे हे चिरंजीव उत्साहात सांगत असतात.दिन्या व्वा व्वा , असं ? म्हणून प्रतिसाद देतो.
चिरंजीव मित्रांबरोबर बाहेर खेळायला निघून जातात.बायको किचनमध्ये स्वयंपाक करत असते. हॉलमध्ये आता दिन्याचंच राज्य असतं.बातम्या संपलेल्या असतात. दिन्या भराभर चॅनेल बदलून मन रमेल अशा चॅनेलचा शोध घेत राहतो.फ़ॅशन टीव्हीवर धमाल चाललेली असते. रॅम्पवर सुंदर सुंदर मॉडेल्स शरीराला हेलकावे देत कॅटवॉक करीत येत जात असतात.मदमस्त संगीत सुरू असतं.दिन्या आवाज कमी करतो.मॉडेल्सना जवळून निरखून बघतो. यंदा भारतात कापूस उत्पादकांच्या आत्महत्या का वाढल्यात याचा आता उलगडा त्याला होतो.तेवढ्यात किचनमधून बायकोची हाक येते.दिन्याने रिमोटवर एक बोट अगोदरच ठेवण्याची दूरदृष्टी दाखवलेली असते.तो पटकन 'संस्कार' चॅनेल लावतो.फॅशन टी व्ही, एम टीव्ही यासारखे रिस्की चॅनेल लावतांना सज्जन माणसांना एक बोट रिमोटवर ठेवूनच बसावं लागतं. संस्कार ,आस्था,सुदर्शन हे तसे रिस्क फ़्री चॅनेल्स आहेत.संस्कारवर बापूंचं प्रवचन सुरू असतं. नवरा सत्संगात रमलेला पाहून बायको अगदी धन्य धन्य होऊन जाते.कूकरची शिटी वाजताच ती बॅक टू पॅव्हेलिअन जाते.आता दिन्या एम टी व्ही हे रिस्की चॅनेल लावतो. अल्पवयीन पिढीला लवकर वयात आणण्याचं महत्वपूर्ण काम इथे वेगाने सुरू असतं.त्याच्या मनात विचार येतो , अशा चॅनेल्सच्या पराक्रमामुळेच भारत तरुणांचा देश बनला आहे ! आम्हाला जे कॉलेजला असतांना जमलं नाही त्यात ह्या मुलांनी आठवीच्या वर्गातच प्राविण्य मिळवलं आहे.कॉलेजचा अभ्यास ही मुलं आठवीतच पूर्ण करतात. अलिकडची पिढी फारच हुशार झाली ती काही उगाच नाही .पुन्हा दारावरची बेल वाजते. पुन्हा दूरदृष्टी कामाला येते. आता दिन्या 'नॅशनल जिओग्राफिक ' हे केवळ रिस्क फ्रीच नव्हे तर ज्ञान देणारं चॅनेल सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणतो आणि दार उघडतो.लग्नाचं निमंत्रण द्यायला मित्र आलेला असतो.ख्याली खुशाली विचारली जाते. चहा येईपर्यंत मित्रही मगरीला पकडण्याचा कार्यक्रम पाहण्यात रंगून जातो. ऑस्ट्रेलियाचा एक हाफ पॅंटवाला पूर्वी कायम दिसायचा.दिन्याने त्याचं नांव 'सापधर्‍या' असं ठेवलं होतं. समुद्रात शूटींग करतांना गेला बिचारा .दिन्याला त्याचं जाम कौतुक होतं.साधा गल्लीतला कुत्रादेखील आपल्याकडे डोळे वटारून पाहतो तेंव्हा तीन इंजेक्शन्स एकाचवेळी शरीरात खुपसल्याचा भास होतो.श्वान महोदयांच्या नजरेला नजर देण्याची आपली हिंमत होत नाही. चुकून दिलीच तर कोण कोणाला अगोदर घाबरतो हे बघून पुढचे डावपेच ठरतात.कुत्रा घाबरला तर आपण विजयी मुद्रेने परतायचं असतं. पण कुत्रा ही संधी सहसा आपल्याला देत नाही.म्हणून दिन्याला सापधर्‍याचं जाम कौतुक आहे.चहापाणी झाल्यावर मित्र निघून जातो. दिन्या आता स्पोर्टस चॅनेल लावतो. क्रिकेटचं समालोचन अर्थात भारताच्या पराभवाची समीक्षा सुरू असते.तशी ती अनेक वर्षांपासून सुरू आहे.फक्त नावे ठेवणारी माणसे बदलत असतात.यावेळी ही जबाबदारी नवज्योतसिंग सिद्धू, श्रीकांत आणि रवी शास्त्रीवर सोपवलेली असते. हसत खेळत भारताच्या पराभवाची चर्चा सुरू असते. युवराजने बेजबाबदार फटका मारला नसता तर भारताला विजयाची संधी होती असं श्रीकांत सांगत असतो .दिन्या इ एस पी एन चॅनेल लावतो त्यावर जुनी मॅच दाखवत असतात.त्यात श्रीकांत बेजबाबदार फटका मारून बाद होतो आणि भारत मॅच हरतो.पूर्वी फक्त दूरदर्शन होतं तेंव्हा दिन्या कुठलेही कार्यक्रम बघत असे. आता इतके चॅनेल असून देखील त्याचं मन कशातच रमत नाही. तो भराभर चॅनेल बदलत राहतो.बहुतेक चॅनेलवर साबणांच्या जाहिराती सुरू झालेल्या असतात.सर्वत्र फेसच फेस ! दिन्या ताजातवाना होतो. भंगार कार्यक्रम बघण्यापेक्षा जाहिराती त्याला आवडतात. 'वा सुनिलबाबू नया घर ......वही मिसेस ?'हे वाक्य त्याच्या मनात घर करून बसले आहे.गळ्यात मण्यांच्या मोठ्या माळा घालून ग्रह फिरले तर काय होऊ शकतं हे कोणीतरी धमकावत असतो. आस्थावर गुरूजी अहिंसेचं महत्व सांगत असतांना शेजारच्या अनीमल प्लॅनेटवर सिंह हरणांची शिकार करत असतात.खानाखजानात संजीव कपूर दाल मखनी, पिझ्झा बनवतांना दिसतो.त्यानंतर असिडिटीवर जालीम इलाज इनो ही जाहिरात झळकते. अशा गंमतीजंमतींमध्ये दिन्याचा मस्त वेळ जातो.दिन्याला साडेआठपर्यंतच टीव्ही बघण्याची संधी आहे. एकदा क का कि की सिरियल्स सुरू झाल्या की त्यानंतर अकरा वाजेपर्यंत त्याला चॅनेल बदलण्याची संधी मिळणार नसल्याने तो भराभर चॅनेल्स बदलत राहतो.