साहित्य संमेलनात ज्यांना कविता सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कवींनी आयोजीत केलेल्या साहित्य
संमेलनास उपस्थीत राहण्याचा योग आला. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय, नोकरी करणार्या कवींनी आपल्या
कवीता या मैफलीत सादर करून एकच धमाल उडवून दिली.
सर्वप्रथम भाजीपाल्याचे ठोक व्यापारी गणपतराव यांनी आपली 'परसबाग' ही रचना सादर केली.
हिरव्या मिरचीचा तोरा
चाफेकळीच्या नाकावर
कसा शोभतो अबोला
टमाट्यांच्या गालावर
भुरूभुरू उडती बटा
डुले जसा तुरा मक्याचा
पाठीवर रुळे शेपटा
जसा वेल पडवळीचा
जसा हिरव्या कोशिंबीरीवर
रंग बीटाचा सांडला
सखे जीव माझा
तसा तुझ्यावर जडला
केवळ तीन कडव्यात गणपतरावांनी सर्व रसिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीची सफर घडवून आणली. प्रेम आणि भाजी मार्केट ही दोन्ही चित्रे कवितेत एकाचवेळी मांडण्याचा काव्यविश्वातील हा पहिलाच प्रयत्न होता.कवितेतील शब्द किती ताजे आणि रसरशीत होते हे सांगायला नकोच !
त्यानंतर ट्रक ड्रायव्हर बाबू याने ( ट्रक खाली होईपर्यंत)'जीवन एक गाडी' ही कविता सादर केली .
जीवनाच्या गाडीची असते का कधी सोपी वाट ?
पार करावे लागतात वळणावळणाचे घाट
खडबडीत रस्यांवर कधी आयुष्याचं चाक पंक्चर होतं
ओझं असह्य होऊन कधी चाकही फुटतं
नवी जोडी टाकून नवी उमेद घेऊन पुढे चालावं लागतं
गाठण्यासाठी ध्येय रात्रंदिवस चालत राहावं लागतं
वाटेत संकटे उभी राहतात नाक्यानाक्यावर लाल दिवा होऊन
डगमगू नका त्यांचा रुद्रावतार पाहून
'एन्ट्री ' तुमची होताच संकटं निघून जातात
मात्र एक लक्षात असू द्या
आडवाटेने जातांना रस्ताही चुकतो
मोठ्यांशी संघर्षात आपण प्राणासही मुकतो
म्हणून थांबा पहा चला
हाच जीवनाचा मूलमंत्र आहे
डाव्या बाजूने पुढे पुढे मार्गक्रमण करीत रहा
मागच्यांना पुढे जाऊ देऊ नका
पुढे आहेत त्यांच्याही पुढे निघा
अंतीम विजय तुमचाच
बाबूभाईंनी कवितेत स्पेशल गिअर टाकला होता.ममद्या क्लिनर,गालीब फिटर,अण्णा टायरवाला,मारूती वेल्डर यांनी जोरदार टाळ्या वाजवून बाबूभाईंच्या कवितेला दाद दिली.कविता आशयाच्या बाबतीत किती 'गतिमान' असते आणि अभिव्यक्तीची कुठली 'वळणे' घेऊ शकते हे बाबूभाईंनी दाखविल्याने रसिक भारावून गेले होते.
गालीब फिटरलाही त्यामुळे स्फूर्ती आली आणि त्यानेही एक कविता सादर केली
पहिल्या भेटीतच झालीस तू
माझ्या जीवनाची अक्सेंट
सफारीसारखी देशील का
जागा हृदयात प्रशस्त
रुप तुझे देखणे आयकॉन परी
लान्सरच्या वेगाने
येशिल का हृदयाच्या मंदिरी ?
नॅनोसारखे तुझ्यासाठी
सखे लागती नंबर
ओळख प्रेम खरे माझे
जरी तुझ्यामागे प्रेमवेडे शंभर
नको करूस चिंता
गावातल्या रस्त्यांची
तुझी पुरवीन हौस
द्रुतगती महामार्गाची
वाट पाहिन तुझी
गडी आहे मी धीराचा
कधी ओलांडशील उंबरा
सखे माझ्या घराचा
तेवढ्यात बाबूभाईने गालीबला मध्येच टोकले
नव्या नव्या मॉडेल्सचा तुला षौक भारी
कसे यावे लान्सरने कायमचे तुझ्या घरी ?
बाबूभाईंनी कवितेतले वास्तव ठळकपणे रसिकांसमोर मांडल्याने गालीबची पंचाईत झाली .रसिकांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट करून बाबूभाईंच्या मताशी सहमती दाखवली
आमदार दादासाहेब यांच्या ( लग्नाच्या) पत्नी गुणवंताबाईंनी उपश्तित राहून कविता सादर केली.
जेंव्हा बघावं तेंव्हा
चिकटून बसता खुर्चीला
वाटू लागले मनाला
विसरलात काय बायकोला ?
सदानकदा काढतात दौरे
आतल्या रूममध्ये मिटींगा
चौफुल्यावर मुक्काम करता
बघा आता माझा इंगा
घरच्या मतदारसंघाचा
आधी विकास करा
तालुक्याच्या प्रत्येक गावी
नंतर पाहिजे तेवढं फिरा
गुणवंताबाईंच्या स्पष्टोक्तीमुळे आमदार दादासाहेबांना आपल्या घरच्या मतदारसंघात किती समस्या साचल्या आहेत याचा साक्षात्कार झाला. कवितेमुळे आत्मभान जागे होणे हेच कवितेचं खरं सामर्थ्य असल्याचा प्रत्यय आला.
शेवटी मोहन स्वीट मार्टचे मालक मोहनभाई कराचीवाला यांनी आपली कवितेची जुनी चोपडी उघडली.
सखे तुझे डोळे
जसे जिलेबीचे वेटोळे
तू काजू कतली नाजूक
जसे रवाळ तूप साजूक
जिन्स घालून मागतेस पोरी
बर्गर आणि पिझ्झा
वडापावाची का सखे
येईल त्याला मजा
असे जरी बावळा
तेलकट वेष माझा
शहरातल्या हलवायांचा
मीच आहे राजा
होशील का गडे खरेच
राणी तू माझी
आयुष्यभर स्वयंपाकाची
मिटेल काळजी तुझी
कवितेचा शेवट सखीसाठी आश्वासक होता .सखीवर कवितेचा परिणाम होण्याऐवजी रसिकांची भूक जागी झाल्याने मोहनभाईंच्या दुकानावर रसिकांनी आपला मोर्चा वळवल्याने काव्य मैफल समाप्त झाली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा