शनिवार, ११ एप्रिल, २००९

कुछ तो लोग कहेंगे


जगात वागावं कसं याची सध्या मधूला चिंता सतावतेय . त्याला सर्वांचंच म्हणणं पटतं.त्यामुळेच तो अडचणीत सापडलाय.करोडपती कसे व्हावे ? हे पुस्तक त्याने विकत आणले ते आयुष्यात प्रगती करून साठीच. पण यामुळे फक्त लेखकाचीच प्रगती झाल्याचे त्याला जेंव्हा उमगले तेंव्हा ठेवीले अनंते तैसीची रहावे या उक्तीप्रमाणे त्याने वागायचे ठरवले. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत.
जगाचं असंच असतं.मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.श्रीमंत असला की म्हणतात ,दोन नंबर करत असणार ! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ?प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.आम्ही चोवीस तास राब राब राबतोय .झालो का श्रीमंत ?तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही .पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात , त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही. नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात.समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार , बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा !स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ?आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं? जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात , अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता.दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील '' अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक ?कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक ? ''मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात.जाड असला की हत्ती म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार ! नाही केली तर म्हणणार साधी माणूसकी नाही.सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा .स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे.परिस्थितीचं गांभिर्य नाही.गंभीर असणंही त्यांना रुचत नाही.म्हणतात हसण्याची अलर्जी आहे.तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते.म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही .मग भोगा कर्माची फळं .लोकांचं काय घेऊन बसलात ? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं ?जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ?
मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय.
फिदीफिदी हसतील ते हसू देत की !
बोटं मोडीत बसतील ते बसू देत की !
आपण का शरमून जायचं ?
कशासाठी वरमून जायचं ?
कशासाठी भयाने ग्रासून जायचं ?
फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ?

२ टिप्पण्या:

Sharayu Gangurde म्हणाले...

so true! जणू काही आपल्या प्रत्येक हालचालींवर लोक लक्ष ठेवून असतात! आणि आपणही तितक्याच सहजतेने, लोक काय म्हणतील ह्याबद्दल विचार करतो, कुठलही काम करताना! ज्या कोण्या व्यक्तीने ह्या पंक्ती लिहिल्या आहेत ना, त्याने खूप पुर्वी नक्किच ओळखल होत- 'कुछ तो लोग कहेंगे'.. पण तो हे ही म्हणतोच- 'लोगोका काम हे कहना'..
आयुष्य कदाचीत असच असत, सारख इतरांसाठी जगायच, दुसर्‍यांचा विचार स्वता: आधी करायचा..लोक काय म्हणतील, याची उगाच काळजी करायची...समाजात रहातो, म्हणून आपण जे नाही आहोत, ते fake करायच! रुढी बदलत आहेत, परंपरा सुद्धा modify होत आहेत, पण लोक मात्र तसेच आहेत- कमी अधिक तसाच, आणि त्याच पठडीत विचार करणारे...
२१व्या शतकात पोहोचलो, पण मूळ विचारसरणी तीच! कोणाचही चांगल आपल्याकडून बघितल जात नाही, काही खवचट टिका केल्याशिवाय...
चांगले मार्क पडले, तर लगेच copy केली असणार, अस म्हणून आपण मोकळे, प्रमोशन मिळाल तर हुजुरगिरी करतात असा शेरा...मग, कस आपण स्वत: ला इतरांपेक्षा वेगळ म्हणवून घेतो?
Human Tendency शेवटी... असो, संजीवदा तुमचा लेख अप्रतिमच... नाशिकला आल्यावर तुम्हाला भेटायला आवडेल मला...!!
अजून असच 'जमके' लेखन करा, आणि आम्ही असच आमच मत hopefully तुम्हाला कळवत राहू.... :)


-Regards
शरयू.

अनामित म्हणाले...

good writing!

keep it up...

for writing also visit www.sahityadarbar.com