शुक्रवार, १ मे, २००९

चॅनेल्सची भटकंती


संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीवर बातम्या बघण्यासाठी दिन्या सोफ़्यावर बसतो. ' सबसे तेज ' हे त्याचं आवडतं चॅनेल.त्याला स्थानिक बातम्यांमध्ये फारसा रस नाही.दिन्या किमान राज्यपातळी किंवा त्यापुढील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळतो.तालीबानच्या बंदोबस्तासाठी बराकने कुठली खेळी खेळायला हवी होती हे फक्त दिन्याच सांगू शकतो.गॉर्डनचं कुठे चुकलं हे फक्त दिन्यालाच कळतं.बराक आणि गॉर्डन दिन्याच्या टीकेला जाम टरकून असतात. बराक म्हणजे आपला ओबामांचा दिवटा ! आणि गॉर्डन म्हणजे यु के च्या ब्राऊनचं शेंडेफळ !परवाच बराक विजयी झाला तर जगभरातून त्याचं अभिनंदन होत असतांना बराकने अगोदर दिन्याला फोन केला .म्हणाला दिनकरराव , खरं तर बराक ड्रिंकरराव असंच म्हणाला होता ते जाऊ द्या. बराक म्हणाला होता , दिनकरराव तुम्ही ' यस वुई कॅन ' ही स्लोगन दिली नसतीत तर माझं काही खरं नव्हतं. शरदरावांनी विलासरावांना कसा शह द्यायला हवा होता याची खबरबात आबांशिवाय फक्त दिन्यालाच आहे.अटलांटीक समुद्रापारचे साहेब आणि आपले बारामतीचे साहेबही आपलं ऐकत असतांना घरात बायको आपलं ऐकत नाही हे शल्य त्याला आहे .
आज जेंव्हा तो ऑफीसहून घरी परतला तेंव्हा आपण ऑफीसला गेल्यापासून जगात काय काय उलथापालथ झाली असेल या चिंतेने तो व्याकूळ झाला होता. मात्र चिरंजीवांनी अगोदरच टेन स्पोर्टसचा ताबा घेतलेला असल्याने अजून अर्धा तास तरी आपल्याला संधी मिळणार नाही हे जाणून तो वर्तमानपत्र वाचू लागतो.सकाळीच सगळ्या बातम्या ' येथे छापून येथे प्रसिद्ध केले ' इथपर्यंत वाचून झालेल्या असल्याने तो शब्दकोडे सोडवू लागतो.बायकोने अगोदरच बरंचसं चुकीचं सोडवून ठेवलेलं असल्याने त्याच्या दुरूस्तीत दिन्याचा बराचसा वेळ जातो.मधूनच तो टीव्ही कडे नजर टाकतो. चिरंजीव डबल्यू डबल्यू ई वर रक्तपात बघण्यात दंग झालेले असतात.खली आणि अंडरटेकरची मारामारी सुरू असते.खलीला ठोशांवर ठोशे बसत असतांना चिरंजीव चिंताक्रांत होतात. रेफ्री अंक मोजू लागतो. नवव्या अंकापर्यंत येतो तेंव्हा तिकडे खली उठून उभा राहतो आणि इकडे चिरंजीव ! एकदाचा खली लवकर जिंकावा अशी दिन्या प्रार्थना करतो.प्रादेशिक बातम्यांची वेळ झाल्यावर दिन्या चिरंजीवांना अभ्यासाची आठवण करून देतो. अभ्यास करूनच चिरंजीव टी व्ही बघायला बसल्याचा संदेश किचनमधून आल्याने दिन्याचा नाईलाज होतो. अंबानी बंधूंची मारामारी रंगलेली असतांना खली आणि अंडरटेकरची मारामारी बघणे त्याला असह्य होते.तेवढ्यात जाहिराती सुरू होतात.दिन्या संधी साधून रिमोट हातात घेऊन बातम्या लावतो. चिरंजीवांना पुढील धोका लगेच लक्षात येतो.तो म्हणतो पपा , 'पप्पू पास हो गया' ही जाहिरात राहू द्या ना . ही जाहिरात ऐकताच बायको किचनमधून धावत येते.किती छान आहे ना असं लाडिकपणे दिन्याला म्हणते. बहुमत आपल्या बाजूला नसल्याचं दिन्याच्या लक्षात येतं. तो पुन्हा टेन स्पोर्टस लावतो.एकदाचा खली जिंकतो.खलीने आतापर्यंत शॉन मायकेल ,जॉन सेना, रॅन्डी ऑर्टन ,ट्रिपल एच यांना कसं हरवलेलं आहे हे चिरंजीव उत्साहात सांगत असतात.दिन्या व्वा व्वा , असं ? म्हणून प्रतिसाद देतो.
चिरंजीव मित्रांबरोबर बाहेर खेळायला निघून जातात.बायको किचनमध्ये स्वयंपाक करत असते. हॉलमध्ये आता दिन्याचंच राज्य असतं.बातम्या संपलेल्या असतात. दिन्या भराभर चॅनेल बदलून मन रमेल अशा चॅनेलचा शोध घेत राहतो.फ़ॅशन टीव्हीवर धमाल चाललेली असते. रॅम्पवर सुंदर सुंदर मॉडेल्स शरीराला हेलकावे देत कॅटवॉक करीत येत जात असतात.मदमस्त संगीत सुरू असतं.दिन्या आवाज कमी करतो.मॉडेल्सना जवळून निरखून बघतो. यंदा भारतात कापूस उत्पादकांच्या आत्महत्या का वाढल्यात याचा आता उलगडा त्याला होतो.तेवढ्यात किचनमधून बायकोची हाक येते.दिन्याने रिमोटवर एक बोट अगोदरच ठेवण्याची दूरदृष्टी दाखवलेली असते.तो पटकन 'संस्कार' चॅनेल लावतो.फॅशन टी व्ही, एम टीव्ही यासारखे रिस्की चॅनेल लावतांना सज्जन माणसांना एक बोट रिमोटवर ठेवूनच बसावं लागतं. संस्कार ,आस्था,सुदर्शन हे तसे रिस्क फ़्री चॅनेल्स आहेत.संस्कारवर बापूंचं प्रवचन सुरू असतं. नवरा सत्संगात रमलेला पाहून बायको अगदी धन्य धन्य होऊन जाते.कूकरची शिटी वाजताच ती बॅक टू पॅव्हेलिअन जाते.आता दिन्या एम टी व्ही हे रिस्की चॅनेल लावतो. अल्पवयीन पिढीला लवकर वयात आणण्याचं महत्वपूर्ण काम इथे वेगाने सुरू असतं.त्याच्या मनात विचार येतो , अशा चॅनेल्सच्या पराक्रमामुळेच भारत तरुणांचा देश बनला आहे ! आम्हाला जे कॉलेजला असतांना जमलं नाही त्यात ह्या मुलांनी आठवीच्या वर्गातच प्राविण्य मिळवलं आहे.कॉलेजचा अभ्यास ही मुलं आठवीतच पूर्ण करतात. अलिकडची पिढी फारच हुशार झाली ती काही उगाच नाही .पुन्हा दारावरची बेल वाजते. पुन्हा दूरदृष्टी कामाला येते. आता दिन्या 'नॅशनल जिओग्राफिक ' हे केवळ रिस्क फ्रीच नव्हे तर ज्ञान देणारं चॅनेल सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणतो आणि दार उघडतो.लग्नाचं निमंत्रण द्यायला मित्र आलेला असतो.ख्याली खुशाली विचारली जाते. चहा येईपर्यंत मित्रही मगरीला पकडण्याचा कार्यक्रम पाहण्यात रंगून जातो. ऑस्ट्रेलियाचा एक हाफ पॅंटवाला पूर्वी कायम दिसायचा.दिन्याने त्याचं नांव 'सापधर्‍या' असं ठेवलं होतं. समुद्रात शूटींग करतांना गेला बिचारा .दिन्याला त्याचं जाम कौतुक होतं.साधा गल्लीतला कुत्रादेखील आपल्याकडे डोळे वटारून पाहतो तेंव्हा तीन इंजेक्शन्स एकाचवेळी शरीरात खुपसल्याचा भास होतो.श्वान महोदयांच्या नजरेला नजर देण्याची आपली हिंमत होत नाही. चुकून दिलीच तर कोण कोणाला अगोदर घाबरतो हे बघून पुढचे डावपेच ठरतात.कुत्रा घाबरला तर आपण विजयी मुद्रेने परतायचं असतं. पण कुत्रा ही संधी सहसा आपल्याला देत नाही.म्हणून दिन्याला सापधर्‍याचं जाम कौतुक आहे.चहापाणी झाल्यावर मित्र निघून जातो. दिन्या आता स्पोर्टस चॅनेल लावतो. क्रिकेटचं समालोचन अर्थात भारताच्या पराभवाची समीक्षा सुरू असते.तशी ती अनेक वर्षांपासून सुरू आहे.फक्त नावे ठेवणारी माणसे बदलत असतात.यावेळी ही जबाबदारी नवज्योतसिंग सिद्धू, श्रीकांत आणि रवी शास्त्रीवर सोपवलेली असते. हसत खेळत भारताच्या पराभवाची चर्चा सुरू असते. युवराजने बेजबाबदार फटका मारला नसता तर भारताला विजयाची संधी होती असं श्रीकांत सांगत असतो .दिन्या इ एस पी एन चॅनेल लावतो त्यावर जुनी मॅच दाखवत असतात.त्यात श्रीकांत बेजबाबदार फटका मारून बाद होतो आणि भारत मॅच हरतो.पूर्वी फक्त दूरदर्शन होतं तेंव्हा दिन्या कुठलेही कार्यक्रम बघत असे. आता इतके चॅनेल असून देखील त्याचं मन कशातच रमत नाही. तो भराभर चॅनेल बदलत राहतो.बहुतेक चॅनेलवर साबणांच्या जाहिराती सुरू झालेल्या असतात.सर्वत्र फेसच फेस ! दिन्या ताजातवाना होतो. भंगार कार्यक्रम बघण्यापेक्षा जाहिराती त्याला आवडतात. 'वा सुनिलबाबू नया घर ......वही मिसेस ?'हे वाक्य त्याच्या मनात घर करून बसले आहे.गळ्यात मण्यांच्या मोठ्या माळा घालून ग्रह फिरले तर काय होऊ शकतं हे कोणीतरी धमकावत असतो. आस्थावर गुरूजी अहिंसेचं महत्व सांगत असतांना शेजारच्या अनीमल प्लॅनेटवर सिंह हरणांची शिकार करत असतात.खानाखजानात संजीव कपूर दाल मखनी, पिझ्झा बनवतांना दिसतो.त्यानंतर असिडिटीवर जालीम इलाज इनो ही जाहिरात झळकते. अशा गंमतीजंमतींमध्ये दिन्याचा मस्त वेळ जातो.दिन्याला साडेआठपर्यंतच टीव्ही बघण्याची संधी आहे. एकदा क का कि की सिरियल्स सुरू झाल्या की त्यानंतर अकरा वाजेपर्यंत त्याला चॅनेल बदलण्याची संधी मिळणार नसल्याने तो भराभर चॅनेल्स बदलत राहतो.

२ टिप्पण्या:

Aniket Samudra म्हणाले...

छान, आवडला लेख.
'फॅशन चालु असताना एक बोट रिमोट' वर माझे पण तस्सेच बर का!!

संजीव देशमुख म्हणाले...

आपण सारे सज्जन !